आर्यन खान, अरबाज मर्चंटला अटकेसाठी ताब्यात घेणाऱ्या के. पी. गोसावी आणि मनिष भानुशालीचा एनसीबीशी काय संबंध?
मुंबई - एनसीबीने (Narcotics Control Bureau) ३ ऑक्टोबर रोजी मुंबई-गोवा क्रुझ ड्रग्ज प्रकरणी कारवाई करून काही लोकांना अटक केली होती. यात बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक झाली आहे. [ads id="ads1"] मात्र आर्यन खानला अटक करून नेताना ज्या व्यक्तीचा फोटो प्रसृत झाला, तो के. पी. गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे के. पी. गोसावी आणि मनिष भानुशालीचा एनसीबीशी काय संबंध? या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाईल व्यक्तींना अटक केली, याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत केली.
३ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राइम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडिओ दिले होते. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के. पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला.[ads id="ads2"] त्यानंतर एनसीबीने ट्विट करून के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के. पी. गोसावी या व्यक्तीबाबत देशात-परदेशात केपीजी ड्रीम्स रिक्रुटमेंट कंपनीचा मालक असल्याची चर्चा आहे. या केपीजी ड्रीम्स रिक्रुटमेंट कंपनीचे मुंबई व नवी मुंबईत कार्यालय आहे. गोसावी हा बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेहमी संपर्कात असतो. त्याच्या फेसबुकवर तो खासगी गुप्तहेर असल्याचे स्टेटस ठेवतो. स्वतःच्या गाडीवर पोलिसांची पाटी लावून फिरताना त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते. तसेच मलेशियात नोकरीचे आमिष दाखवून एका तरूणाकडून ३ लाख उकळल्याप्रकरणी पुण्यामध्ये त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अशा व्यक्तीचा एनसीबीशी काय संबंध आहे, हे आता समोर आले पाहिजे, असे नवाब मलिक म्हणाले.
तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा २०१२ पर्यंत भाजपचा कल्याण भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. त्यामुळे हा भानुशाली कोण? हे देखील एनसीबीने स्पष्ट करावे, अशी मागणी मलिक यांनी केली.
सध्या के. पी. गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाइल लॉक आहे. पण भानुशालीची हालचाल आम्ही शोधून काढली असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला. भानुशाली हा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. २१ सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर २८ तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा सामील होता? मनिष भानुशालीचा गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जशी काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने द्यायला हवी, असे मलिक म्हणाले.
क्रुझवर जे अंमली पदार्थ सापडल्याचे सांगितले जात आहेत, त्याचे फोटो देखील एनसीबीच्या मुंबईतील प्रांतिक कार्यालयात काढले गेले आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार अंमली पदार्थ जप्त केल्याच्या ठिकाणीच त्याचा पंचनामा झाला पाहिजे. मग क्रूझवर अमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ का नाही काढले गेले? असाही प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला.
३६ वर्ष एनसीबीने चांगले काम केले होते - नवाब मलिक
स्व. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना २३ ऑगस्ट १९८५ रोजी एनडीपीएस कायदा पारित करण्यात आला. देशाला अंमली पदार्थांच्या जाळ्यातून बाहेर काढणे, हा उद्देश कायदा लागू करताना राजीव गांधी यांचा होता. अमली पदार्थांचे उत्पादन, खरेदी-विक्री, ट्रान्सपोर्ट करणारे सर्व या कायद्याखाली आरोपी म्हणून निश्चित झाले. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार केंद्रासहीत राज्यांनाही देण्यात आले. तसेच एनसीबी ही केंद्रीय यंत्रणाही गठीत करण्यात आली. एकापेक्षा जास्त राज्यात गुन्हे घडले असतील किंवा परदेशात गुन्ह्याचे कनेक्शन असेल तर त्याचा छडा लावणे सोपे जावे, यासाठी ही केंद्रीय यंत्रणा बनविण्यात आली होती. मागच्या ३६ वर्षांत या केंद्रीय यंत्रणेने चांगले काम केले. अनेक मोठी रॅकेट्स या यंत्रणेने उद्ध्वस्त केली. मात्र आता एनसीबी ही भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे का? अशी शंका मलिक यांनी उपस्थित केली. तसेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांना झटपट प्रसिद्धी मिळवण्याची ओढ लागली असल्याचेही ते म्हणाले.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरही एनसीबीचे कार्यालय चर्चेत आले होते. त्यावेळी देखील बॉलिवूडला बदनाम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पद्धतशीरपणे लावण्यात आले. त्यात सेलिब्रिटी दाखवून बॉलिवूड कसे नशेच्या आहारी गेले आहे, हे दाखविण्यात आले. आताही आर्यन खान प्रकरणात असाच प्रकार सुरू आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयात याचा ऊहापोह होईलच. मात्र पत्रकारांनी एनसीबीच्या माहितीवर बातमी देताना खोलात जाऊन एखाद्या प्रकरणाचा तपास केला पाहीजे, अशी भूमिका नवाब मलिक यांनी यावेळी मांडली.
या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो व प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.

