रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर द्या- नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, - जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेवर भर देऊन दर्जेदार कामे करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. [ads id="ads2"]
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पाचा आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत आढावा घेतला. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांचेसह दूरदृश्य प्रणालीद्वारे जळगाव महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आदी उपस्थित होते [ads id="ads1"]
जळगाव शहरातील रस्त्यांसाठी नगरविकास विभागाने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत असून मुख्य रस्त्यांची कामे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. शहरातील रस्त्यांची कामे सूचविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. या समितीमध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचा समावेश असेल. रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार असून रस्त्यांची कामे करताना ते दर्जेदार करण्यावर भर देण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.