स्वच्छ भारत मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून "गाव हगणदारी मुक्त" करण्यासाठी केंद्र सरकार वैयक्तीक शौचालयच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून लाभार्थ्याला 12 हजार रुपये देते. याच योजनेत रावेर तालुक्यात मोठा भ्रष्ट्राचार झाला असून या प्रकरणी बुधवार, 20 रोजी रावेर पंचायत समिती येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्याविरुध्द रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास रावेर पोलीस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक तपास करीत आहे.[ads id="ads2"]
दिड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप
गट समन्वयक समाधान निंभोरे यांनी ओळखीच्या लोकांच्या खात्यावर स्वच्छ भारत मिशनच्या खात्यावरून एक कोटी 51 लाख 61 हजार 533 वर्ग केल्याचा आरोप असून स्वत:च्या खात्यावर 12 हजारांप्रमाणे 33 वेळा सहा लाख चार हजार 477 रुपये वर्ग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच समूह समन्वयक मंजुश्री पवार यांनी 12 हजारांप्रमाणे 35 ओळखीच्या लाभार्थींच्या नावे चार लाख 20 हजार वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे तसेच बीडीओ यांच्या खोट्या स्वाक्षर्यांच्या याद्या बँकेला दिल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.