प्रशांत टेके पाटील (कोपरगाव तालुका प्रतिनिधी ) कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून रब्बी हंगामातील सर्व पिकांमध्ये पाणी साचून मोठी नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी हिवाळ्यातही पाऊस होत असल्याने बळीराजावर मोठे संकट निर्माण झाले आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कांदा, गहू ,हरभरा, ज्वारी, मका आदी पिके घेतलेली आहेत. पिकांची पेरणी झाल्यापासून सातत्याने ढगाळ हवामान व कधीही पडणारा अवकाळी पाऊस यामुळे पिकांवर विविध प्रकारच्या रोगराईने थैमान घातले आहे.सततच्या ढगाळ वातावरणामुळे सर्वच पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्व दृष्टचक्र तून आपल्या पोराबाळा सारखे जपलेल्या पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी महागडे कीटकनाशकांची फवारणी करताना दिसत आहे. हे सर्व होत असताना वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निसर्गाने आपला लहरीपणा दाखवून पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. ओंब्या भरत आलेला गहू जमिनीवर आडवा पडलेला आहे. तसेच पावसाचे पाणी शेतामध्ये साचून सर्व पिकांच्या मुळ्या सडून पीकही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रचंड प्रमाणात खर्च करून उभे केलेले पिके निसर्गाने बळीराजाच्या हातातून हिरावून घेतली तर उत्पादन खर्चही निघाला नाही. तर खाजगी सावकार ,सोसायटी, बँक, उसनवारीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन भरपाई देण्याची आवश्यकता आहे.तसेच पिक विमाची रक्कमही शेतकऱ्यांना देऊन थोडासा हातभार लावणे गरजेचे आहे.
" अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांची नासाडी "
रविवार, डिसेंबर २९, २०२४
Tags