सर्वाधिक 35 कोटी 35 लाख नुकसान भरपाई मिळणार जळगाव जिल्ह्याला : पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा पाठपुरावा
जळगाव - यंदाच्या मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वा-यामुळे बाधीत झालेल्या शेतकर्यांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली
[ads id="ads1"]
असून राज्यात सर्वाधिक ३५ कोटी ३५ लाख रूपयांची मदत ही जळगाव जिल्ह्यास जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.
यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे आपत्तीग्रस्त शेतकर्यांसाठी राज्य मंत्रीमंडळाच्या १२ मे, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथील विभागीय आयुक्तांकडून १२२ कोटी २६ लाख ३० हजार रूपयांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
या अनुषंगाने आज राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे. यात केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( एसडीआरएफ) दरानुसार मदत अनुज्ञेय करून सर्व विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या विवरणानुसार ही मदत प्रदान करण्यात येणार
[ads id="ads2"]
असून आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आजच्या शासन निर्णयातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३५ कोटी ३५ लाख ३१ हजार रूपये इतकी रक्कम ही जळगाव जिल्ह्यास मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना यंदा निसर्गाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकर्यांना मदत देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेऊन जिल्ह्यास भरीव मदत जाहीर करण्यात आली असून याचा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना लाभ होणार आहे.
शासन निर्णयानुसार पीक आणि फळबागांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्यांना या मदतीचा लाभ होणार आहे. या संदर्भात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची संयुक्त स्वाक्षरी असणारे पंचनामे ग्राह्य धरून संबंधीत शेतकर्यांना ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून थेट जमा करण्यात येणार आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारे शेतकर्यांना रोख रक्कम देऊ नये, तसेच बँकांनी यातून कोणत्याही प्रकारची कपात करू नयेत असे स्पष्ट निर्देशही या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मार्च ते मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आधीच पंचनामे करण्यात आलेले असून त्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना लवकरच मदत मिळणार आहे. याप्रमाणेच अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांनाही राज्य शासनाकडून आपण मदत मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
