रावेर तालुका प्रतिनिधी (प्रशांत गाढे)
रोख रक्कम आणि शस्त्रांसह आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील सशस्त्र दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी भुसावळ आणि अकोला तालुक्यातील पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे, तर एका अल्पवयीन सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
(ads)
९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुक्ताईनगर येथील रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला होता. यानंतर दरोडेखोरांनी कर्की फाटा (ता. मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील सैय्यद पेट्रोल पंपावरही लूटमार केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर चोरले आणि एकूण १ लाख ३३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.
(ads)
अटक आरोपींची नावे:
सचिन अरविंद भालेराव (वय ३५, भुसावळ, मूळ रा. खकनार, जि. बुर्हाणपूर, म.प्र.)
पंकज मोहन गायकवाड (वय २३, वेडीमाता मंदिर, जुना सातारा रोड, भुसावळ)
हर्षल अनिल बावस्कर (वय २१, बाळापूर, जि. अकोला)
देवेंद्र अनिल बावस्कर (वय २३, बाळापूर, जि. अकोला)
प्रदुम्न दिनेश विरघट (वय १९, श्रद्धा नगर, कौलखेड, अकोला)
पोलिसांनी आरोपींकडून ४० हजार रुपये रोख, तीन गावठी पिस्तुले, पाच मॅगझिन, नऊ मोबाईल फोन आणि एक निळी सॅक बॅग जप्त केली आहे.
(ads)
गुन्हे शाखेची कौशल्यपूर्ण कारवाई: जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि भुसावळचे उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. पथकात पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे आणि ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी चार आरोपींना नाशिक येथून, तर एका आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अकोल्यातून ताब्यात घेतले.
(ads)
मुख्य आरोपीचा गुन्हेगारी इतिहास: मुख्य आरोपी सचिन भालेराव याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि दंगल यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, २०२४ मध्ये त्याला महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.या यशस्वी कारवाईमुळे मुक्ताईनगर, भुसावळ आणि परिसरातील नागरिक आणि व्यापारी वर्गात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



