रावेर तालुका प्रतिनिधी :
रावेर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिड्या, अंधारमळी आणि मोहंमाडली या गावांमधील BSNL मोबाईल टॉवर मागील दोन दिवसांपासून बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधून टॉवर सुरू करण्याची मागणी केली. मात्र, अद्यापही नेटवर्क सेवा पूर्ववत झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
(ads)
या भागातील अनेक नागरिक शासकीय योजनांचे अर्ज, बँक व्यवहार, ऑनलाइन शिक्षण, आरोग्य सेवा तसेच दैनंदिन संपर्कासाठी मोबाईल नेटवर्कवर अवलंबून आहेत. नेटवर्क सेवा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.विशेष म्हणजे हा भाग डोंगराळ व दुर्गम असल्याने BSNL सेवा हीच अनेक गावांची एकमेव संपर्क व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत टॉवर बंद राहिल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदतीसाठी संपर्क साधणेही कठीण झाले आहे.
(ads)
स्थानिक नागरिकांनी BSNL प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन बंद पडलेला टॉवर सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
(ads)
"दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत दूरसंचार सुविधांपासून वंचित ठेवणे योग्य नाही. BSNL प्रशासनाने तातडीने तांत्रिक बिघाड दूर करून सेवा सुरळीत करावी," अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


