ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे वनमहोत्सव सप्ताहानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिसरात विविध वृक्षांची लागवड केली.
(ads)
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, वाढते तापमान, जमिनीची धूप आणि पर्यावरणीय असंतुलन यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड हा प्रभावी उपाय आहे. मानवाला जीवनावश्यक ऑक्सिजन झाडांपासूनच प्राप्त होत असल्याने प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
(ads)
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी पृथ्वीवरील बदलत्या हवामानाचा परिणाम, कमी होत असलेले पर्जन्यमान आणि वाढती मृदधूप याकडे लक्ष वेधत वृक्षसंवर्धनाची गरज स्पष्ट केली. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
(ads)
या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी आभार मानले. त्यानंतर स्वयंसेवकांनी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाची शपथ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


