विशेष लेख : विद्येची खरी देवता - सावित्रीमाई फुले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

▪️ शिक्षणोत्सव व महिला शिक्षण दिन विशेष -✒️ पी. डी. पाटील सर

भारतातील थोर समाज सेविका, शिक्षण क्रांतीच्या जनक, स्फूर्तिनायिका, विद्येची खरी देवता, कवयित्री सावित्रीमाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी नायगाव, ता. खंडाळा जि. सातारा येथे झाला. माईंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे पाटील होते. [ads id="ads1"] 

  खंडोजी व लक्ष्मीबाई यांना चार अपत्य होती. सर्वांत थोरल्या सावित्री तर त्यांच्या पाठीवर सिदुजी, सखाराम आणि श्रीपती ही तीन मुलं. शिवशाहीपासून नेवसे घराणे हे मानमरातब असलेले घराणे. शौर्याच्या इतिहासामुळे घराण्यात पाटीलकी आलेली होती. नायगाव परिसरात वाद, तंटे सोडविण्याचे काम खंडोजी करत असत. सावित्रीचा जन्म झाल्यानंतर गावभर साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. सावित्रीमाई या लहानपणापासूनच अतिशय धाडसी, तेजस्वी व आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे करणाऱ्या होत्या.[ads id="ads2"] 

  इ. स. १८४० मध्ये सावित्रीमाईंचा विवाह जोतीरावांशी झाला. विवाहाच्या वेळी जोतीरावांचे वय होते तेरा वर्षे तर सावित्रीमाईंचे दहा वर्षे. लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीमाईला शिक्षण दिले. सावित्रीमाईंनी स्वतः शिक्षण घेतलं आणि पुढे स्त्रिया आणि शूद्रातीशूद्रांना शिक्षण देण्याचं काम केलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थात सावित्रीमाई याच स्त्री शिक्षणाच्या जनक, विद्येची स्फुर्तीनायिका, विद्येची खरी देवता आहेत.

  "जोतीरावाप्रमाणे सावित्रीमाईंनाही शिक्षणाचे महत्व पटलेलं होतं. म्हणून या कामात जोतीरावांच्या बरोबरीने सावित्रीमाई मुलींना शिकवायचं काम करत होत्या. १ जानेवारी १८४८ ला पुणे येथे भिडेच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.  यात सहा मुली होत्या. सहा पैकी चार ब्राह्मण एक मराठा आणि एक धनगर होत्या. पुण्यात मुलींना शिक्षण देण्याचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा कलयुग आलं, धर्म बुडाला, कली मातला अशी कोल्हेकुई सनातनी ब्राह्मणांनी सुरू केली. परंतु त्यांना हे शैक्षणिक कार्य बंद करता आले नाही. 

  सावित्री माईंसोबत मुस्लीम समाजातील पहिल्या शिक्षीका फातिमा शेख या देखील काम करत होत्या. १५ मे १८४८ ला पुण्यात महारवाड्यात एक शाळा सुरू झाली. जिथं सगुणाबाई या शिक्षिका होत्या. इ. स. १८४८ ते १८५२ दरम्यान पुण्यामध्ये एकूण २० शाळा सुरू झाल्या होत्या. आनंद शिक्षण, प्रौढ शिक्षण, रात्रीची शाळा अशा विविध प्रयोग चालवत असताना सावित्रीमाईंना शेण, चिखल, घाण इत्यादी अंगावर घ्यावं लागलं. प्रसंगी गुंडाशीही सामना करावा लागला. परंतु हाती घेतलेलं काम सावित्रीमाईंनी सोडलं नाही. ज्या ब्राह्मण वर्गाकडून सावित्रीमाईंना छळण्यात आलं त्याच ब्राह्मण वर्गातील मुलींची संख्या ही जोतीराव सावित्रीच्या शाळेत सर्वाधिक होती. १६ नोव्हेंबर १८५२ - रोजी जोतीराव सावित्रीच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले - सावित्री माईंचा भव्य समारंभ घेऊन गौरव केला.

  केवळ शाळा काढून जोतीराव - सावित्रीमाईं थांबले नाहीत तर त्यांनी शाळेसाठी अभ्यासक्रमही तयार केला. जोतीरावांनी सुरू केलेल्या सर्व शाळांच्या प्रमुख या सावित्रीमाई होत्या. विद्यार्थ्यांना बसण्यास चांगली जागा, शालेय शिस्त इत्यादी बाबी सावित्रीमाईंनी कटाक्षाने पाळल्या बुद्धिमत्ता, नितीमत्ता आणि विद्वता या बाबतीत अग्रेसर असलेल्या सावित्रीमाईंचे वाचन, मनन आणि चिंतन हे सखोल होते. आपल्या कामाबद्दल त्यांना आवड होती. तेवढाच आत्मविश्वासही होता. सावित्रीमाईंची अभिरूची आणि निर्णयशक्ती उच्च दर्जाची होती. पालकांच्या भेटी घेणे, हुशार विद्यार्थ्यांना पारितोषिके देणे इत्यादी उपक्रम सावित्रीमाई सातत्याने राबवायच्या. 

   छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याबद्दल सावित्रीमाईंना खूप आकर्षण होते. महाराणी ताराराणी यांच्याबद्दलही त्यांना तेवढाच आदर होता. सावित्रीमाईंच्या प्रत्येक शाळेत शिवजयंतीचा कार्यक्रम होत असे. सावित्रीमाई शाळेत गैरप्रकार झालेला अजिबात खपवून घेत नसत. वेळप्रसंगी त्या तेवढ्याच आक्रमक होत असत. नायगावसारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेली शेतकऱ्याची मुलगी लग्नानंतर शिक्षण घेते, भारतातील पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान मिळवते हे ऐतिहासिक सत्य अनूजही काही महाभागांना मान्य नाही. सर्वच स्त्रियांना नाकारण्यात आलेला शिक्षणाचा अधिकार सावित्रीमाईंनी मुली, महिलांना मिळवून दिला.

  निर्मिकाचेच हे काम आहे, असं समजून त्या शिक्षण देण्याचा काम करत होत्या. स्त्रियांचे दुःख पाहून त्या रडत बसल्या नाहीत तर त्यासाठी जो अपेक्षित संग्राम आहे तो त्यांनी उभा केला. आज सावित्रीमाईंमुळेच आजची महिला गावाच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत विराजमान झालेली आपल्याला दिसते. बालविवाह, केशवपन, भ्रूणहत्या, सतीची चाल या सर्वच वाईट प्रथांबद्दल सावित्रीमाईंना चीड होती. व त्यांनी आपले पती जोतीराव यांच्या मार्गदर्शनाने या सर्व अनिष्ट प्रथा बंद केल्या.

  जोतीराव - सावित्रीने आयुष्यभर संघर्ष केला. त्याकाळी काही सनातनी विधवा महिलांवर अत्याचार करायचे व त्या गरोदर राहायच्या आणि आत्महत्येस बळी पडायच्या अशा सर्व विधवांसाठी तात्यासाहेबांनी व माईंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली व अशा महिलांचे बाळांतपण आपल्या घरी सुरु केले. अज्ञानी आई-बापाचे मूल आपल्या पदरात घेऊन त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे लहानाचा मोठा करणारी उदार हृदयी स्त्री पहावयास मिळते, पण एखाद्या विधवेला अनैतिक संबंधातून झालेले मूल आपलेच समजून त्याचे संगोपन करणारी माता दुर्मिळच!.... सावित्रीमाईच्या बालगृहात बाळंतपणास आलेल्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण तरूण विधवेला झालेलं मूल सावित्रीमाईंनी दत्तक घेतलं. त्याचं नाव यशवंत ठेवलं. पुढे त्यास डॉक्टर बनवलं आणि याच यशवंतचा विवाह ४ फेब्रुवारी १८८९ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी हडपसर येथील ग्यानबा कृष्णराव ससाणे यांची मुलगी राधाबाईंशी सत्यशोधक पद्धतीने लावला. म्हणूनच तात्यासाहेब ज्योतिराव फुले व सावित्रीमाई हे बोलके सुधारक नसून ते कर्ते सुधारक होते.

  इ.स.१८७६-७७ ला दुष्काळ पडला होता. जोतीरावांनी लोकांना दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं. मिळेल तेथून अन्न गोळा केले. सावित्रीमाईने दोन हजार अन्नछत्रे सुरू केली. अन्नछत्राच्या ठिकाणी जाऊन सावित्रीमाई स्वतः स्वयंपाक करत असत..

  "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी साहित्यक्षेत्रातही भरीव कामगिरी केली. १८५४ ला काव्यफुले आणि १८९१ मध्ये 'बावनकशी', 'सुबोध रत्नाकर' हे दोन काव्यसंग्रह लिहिले. सावित्रीमाई फुले या आद्य कवयित्री व विचारवंत होत्या.

  २८ नोव्हेंबर १८९० ला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले महापरिनिर्वाण झाले. तेव्हा सावित्रीमाईंचं वय ६३ वर्षे होतं. जोतीरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीमाईवर येऊन पडली होती. मोठ्या धैर्याने आणि तेवढ्याच शांतपणे त्यांनी ही जबाबदारी पुढे चालवली. या क्रांतीकार्यात कुठेही पोकळी निर्माण होऊ दिली नाही. क्रांतीकार्याची ज्योती अखंड तेवत ठेवली. इ. स. १८९६ च्या दुष्काळातून लोक मुक्त होतात ना होतात तोच इ.स. १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. प्लेगने हाहा:कार माजवला. लोक मृत्यूमुखी पडत होते. कित्येकांचे कुटुंब नामशेष होत होते. सावित्रीमाई हे सर्व दुःखी मनाने व डबडबल्या डोळ्यांनी पाहत होत्या. इंग्रज आधिकारी आणि कमिशनर रैंड प्लेगच्या नावाखाली घराघरात घुसून धुडगूस घालत होते. लुटमार करत होते. लोकांना रोगापेक्षा या टोळ्यांचीच जास्त भिती वाटायला लागली होती. सावित्रीमाईंच काम मात्र विधायक होतं. त्या सरकार दरबारी लोकांच्या तक्रारी पोहचवीत होत्या. प्लेग हा संसर्गजन्य आहे हे माहिती असूनही रोग्यांची सेवा, शुश्रूषा करीत होत्या. यातच मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेग झाल्याचे कळताच सावित्रीमाई तेथे पोहचल्या. त्यास पाठीवर घेऊन दवाखान्याकडे जात होत्या. दुर्दैवाने सावित्रीमाईंनाही प्लेगची लागण झाली आणि यातच १० मार्च, १८९७ रोजी रात्री ९ वाजता क्रांतिज्योती सावित्रीमाईंचं निधन झालं. स्त्री, शूद्रातिशूद्र, बहुजन समाजाला प्रकाश देत आयुष्यभर तेवत असलेली जोतीरावांची ज्योत कायमची मालवली.

अशा या विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला त्रिवार कोटी-कोटी त्रिवार वंदन !.... माईंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 

मा.पी.डी.पाटील सर

उपशिक्षक - महात्मा फुले हायस्कूल धरणगाव, 

ता. धरणगाव, जि. जळगाव. [ खान्देश ]

📱९४०३७४६७५२


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!