भुसावळ : येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना रेल्वेने त्रासापोटी २५ हजार व तक्रार खर्चापोटी ३ हजार द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक मंचने दिला आहे.[ads id="ads1"]
ललवाणी यांनी २२ मे २०१८ रोजी गुवाहाटी (आसाम) येथून भुसावळ येण्यासाठी गाडी क्रमांक १५६४८ या रेल्वे गाडीचे आरक्षण केले होते. ही गाडी दुपारी तीन वाजता गोवाहाटी रेल्वे स्टेशनवरून निघणे निश्चित होते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशनवर आले.[ads id="ads2"]
तीन वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांना भ्रमणध्वनीवर वा कोणतीही सूचना न मिळाल्यामुळे त्यांनी रेल्वे विभागात लेखी तक्रार केली. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की गाडी साडेसहा तास उशिराने निघेल. नंतर सुद्धा मात्र गाडी प्लॅटफॉर्मवर न आल्यामुळे त्यांच्या समवेत सहप्रवासी नितीन छेडा हे तक्रार करायला गेले असता त्यांनी गाडी पुन्हा तीन तास उशिरा येईल असे नमूद केले. त्यामुळे तीन वाजता सुटणारी गाडी ही रात्री जवळपास पावणे बारा वाजता गुवाहाटी स्थानकावरून रवाना झाली.
यामुळे त्यांना व त्यांच्या परिवाराला व सोबत असलेल्या सर्व सह प्रवाशांना मानसिक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला भुसावळ येथे परतल्यानंतर त्यांनी रीतसर पुन्हा लेखी तक्रार केली. त्याला उत्तर न आल्यामुळे त्यांनी वकिलामार्फत गुवाहाटी रेल्वेला नोटीस पाठवली. त्याचीसुद्धा दखल न घेतल्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच जळगाव यांच्या समोर ८ एप्रिल २०१९ रोजी तक्रार दाखल केली. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून ग्राहक आयोग यांनी तक्रारकर्ता प्रा. ललवाणी यांचे म्हणणे अंशतः मान्य करून त्यांना झालेल्या त्रासाबद्दल रुपये पंचवीस हजार व तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रुपये तीन हजार अदा करावेत असा आदेश ग्राहक ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्रभारी अध्यक्षा पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी दिला. याकामी भुसावळ येथील ॲड. धिरेंद्र आर. पाल यांनी बाजू मांडली.

