जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जळगाव जिल्हयातील बिडगाव (ता. चोपडा) येथील भूमिपुत्र व इंडो- तिबेट बार्डर फोर्समध्ये (आयटीबीपी) कार्यरत असलेले जवान अशोक हिरामण पाटील यांना गुवाहाटी येथे वीरमरण आले.अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना आसामच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी (दिनांक ६) त्यांची प्राणज्योत मालवली. अशोक पाटील यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी (दिनांक ८) चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.[ads id="ads1"]
बिडगाव येथील अशोक हिरामण पाटील (३५) हे अरुणाचल प्रदेश येथील युपिया येथे इंडियन तिबेट बार्डर फोर्स ३१ बटालियन येथे सेवेत होते. त्यांना पाच दिवसांपूर्वी डोक्यात त्रास होऊ लागल्याने व तब्येत खालावल्याने आसाम येथील गुवाहाटीच्या सैनिक रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी (दिनांक ६) सकाळी त्यांचे निधन झाले.[ads id="ads2"]
त्यांचे पार्थिव गुवाटीहून विशेष विमानाने हावडा व तेथून इंदूर व वाहनाने बिडगाव येथे आणले जाणार आहे. गुरुवारी (दिनांक ८) दुपारपर्यंत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. हिरामण झावरू पाटील यांचा अशोक हा एकुलता मुलगा होता. अशोक पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे.


