रावेर | प्रतिनिधी
रावेर नगरपालिका, महसूल, व पोलीस प्रशासन अशा संयुक्त सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर आता दुजाभावाचे आरोप होत असून रावेर शहरात या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला अनेक लहान व्यावसायिकांची अतिक्रमित दुकाने हटविण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी अतिक्रमणे आजही कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
(ads)
या कारवाईमुळे अनेक लहान व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या छोट्या व्यवसायांवर अवलंबून होता. दुकाने हटविल्यानंतर त्यांच्यासमोर बेरोजगारीचे संकट उभे राहिले असून कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(ads)
नागरिकांचे म्हणणे आहे की, अतिक्रमण हटाव मोहीम राबवायची असेल तर ती सर्वांसाठी समान निकषांवर राबविणे आवश्यक आहे. काही ठिकाणी कारवाई झाली, तर काही ठिकाणी अतिक्रमित दुकाने आणि बांधकामे अद्यापही थाटात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
(ads)
सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात पारदर्शकतेची मागणी केली असून, शहरातील सर्व अतिक्रमणांचे एकसमान सर्वेक्षण करून कोणताही भेदभाव न करता कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
(ads)
दरम्यान, संबंधित प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेची स्पष्ट निकष, संबंधित नोंदी आणि कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना समानता, पारदर्शकता आणि न्याय या तत्त्वांचे पालन झाले तरच नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कायम राहील, अशी भावना रावेर शहरातून व्यक्त होत आहे.
(ads)
अतिक्रमित दुकानदारांची उपासमार रावेर शहरात टपऱ्या व रस्त्याच्या रस्त्यामध्ये अडचण येणारे अतिक्रमण सुद्धा करण्यात आले परंतु अनेक रावेर शहरातील अनेक दुकान हे पक्के स्वरूपात बांधण्यात आलेली आहेत त्यांच्यावर मात्र कारवाई केली नसून यामागे राजकीय आश्रय व धनात्य श्रीमंत लोकांचे अतिक्रमण का काढण्यात आली नाही याबद्दल चर्चा आहे अनेक लोकांनी आपले बेकायदेशीर बांधकाम दोन दोन तीन मजली बांधलेल्या आहेत त्यांच्यावर का कारवाई झाले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहेत.


